".. फक्त ३६५ दिवस बाकी", ".. फक्त १० दिवस बाकी", ".. फक्त २४ तास बाकी" म्हणता-म्हणता तुमचा आमचा (अर्थात सर्वांचाच) लाडका गणू बाप्पा आला.
तो येतो, राहतो, आपल्यात रमतो आणि निरोप घेताना मात्र डोळ्यात अश्रू आणि पुढल्या वर्षाची प्रतीक्षा देऊन जातो. 'बाप्पा' ह्या शब्दाचा अर्थ माहिती नसेल तर, जो आदरणीय आहे, जो पूज्य आहे असा. गणेश चतुर्थीचा उत्साह आणि उमेद ही काही औरच!
पण, लोकमान्य टिळकांनी गणेश स्थापनेची संकल्पना का बरं अमलात आणली असेल?
सोप्पं आहे, सार्वजनिकरीत्या तमाम हिंदू लोकांनी एकत्र यावं, जाति-कुजातिंचा उंबरठा ओलांडून एकत्र यावं ह्या उद्देशाने त्यांनी ही परंपरा सुरू केली. पण आताच्या घडीला काय होतंय हो? मोठ-मोठाले अपार्टमेंट्स झाले, बिल्डिंग्स् उभारल्या गेल्या, प्रत्येकाचे स्वतंत्र फ्लॅट्स झाले आणि आपला गणू बाप्पा मर्यादित होत गेला. 'ओवाळा-ओवाळा' म्हणायला जेथे हजारोंच्या संख्येने लोकं यायची ती संख्या अवघ्या ४-५ वर येऊन ठेपली. ज्याची त्याची श्रद्धा-आस्था आहे अँड आय अॅम नोबडी टू कमेंट ऑन दॅट. पण, सामाजिक बांधिलकीचं प्रतीक गणल्या जाणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं काय?
'देव भावाचा भुकेला' हे माहिती असताना देखील डेकोरेशन मात्र सुरेख असावं, "आमच्या घरचा गणपती येऊन बघा, यावर्षी डेकोरेशनचा वेगळा पॅटर्न ट्राय केलाय" असं म्हणून गणेशोत्सवाची अख्खी शोभा पाण्यात घालणारे आपणच! अहो, जो देव, जी शक्ती दुनियेच्या स्पर्धेत आपल्या पाठीशी उभी असते, त्याच्याच देखाव्यासाठी स्पर्धा का?
ही श्रद्धा नव्हे, दंभाचारच!
ख़ैर, जाने दो. आता तो आलाय, आपले सुखं-दुःखं, वेदना, त्रास, आनंद सगळं-सगळं त्याच्याशी शेअर करूयात आणि नेहमी हसतमुख राहूयात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा