शीर्षक वाचून कळलंच असेल विषय किती गंभीर असेल ते. आमच्या वकिलीच्या भाषेत 'मृत्युपत्र' म्हंटलं की डोळ्यापुढे येतं ते स्थावर मालमत्ता, दाग-दागिने, पैसे, बँकेची एफ.डी., इ. आपल्या मृत्यूनंतर आपल्या प्रॉपर्टीची वहिवाट कशी आणि कोण करेल त्यासाठी म्हणून हयातीत लिहिला जाणारा दस्त म्हणजे आम भाषेत मृत्युपत्र. पण, जे मला सांगायचंय, तो 'मृत्युपत्र' वेगळाय.
आपलं जीवन आपण कसं जगायचं हे जरी आपल्या हाती असलं तरी, आपला मृत्यू आपल्या हातात अजिबातच नाहीये. आज हसत खेळत जगणारी व्यक्ती उद्या काळाच्या विळख्यात सापडते आणि आपल्या नजरेच्या लांब निघून जाते आणि हा प्रसंग प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी अनुभवलाच असेल. मी पण अनुभवलंय हे. माझी आज्जी संध्याकाळ पर्यंत हसरी बोलकी होती आणि एकाएकी तिला हृदयविकाराचा त्रास सुरू झाला आणि क्षणार्धात ती होत्याची नव्हती झाली. देवाने तीचं एवढंच आयुष्य लिहिलं असावं आणि आम्ही ते मान्य देखील केलं.
असो.
हे मृत्युपत्र मला लिहायचंय ते थेट परमेश्वराला उद्देशून!
आज माझ्या आयुष्याची ढकलगाडी ही विशीतील मध्यान्यात येऊन पोहोचलीय. माझ्याकडे स्वतःची किंवा स्वार्जित अशी खूप धन-दौलत काहीच नाहीये. मृत्यू कधीही माझ्या दाराशी येऊन दार ठोठावू शकतो. आज किंवा उद्याही!
मग सरतेशेवटी मी माझ्या आत्मीयांसाठी काय केलंय, इष्ट मित्रांसाठी काय केलंय, ह्या समाजासाठी, देशासाठी काय केलंय हेच महत्त्वाचं ठरेल. मी माझ्या अल्प प्रयत्नाने, बुद्धी कौशल्याने आणि जमेल तितक्या तितिक्षेने मला माझ्या घरच्यांसाठी, मित्रांसाठी आणि समाजासाठी जे-जे काही करता येईल तेवढं मी करेल.
देवा परमेश्वरा, मी ह्या इहलोकातून सांगता घेतल्यानंतर तुझ्यावरच एक जबाबदारी सोडून जाईल, ती म्हणजे, मी इथून गेल्यावर माझ्या मागे जेव्हा-केव्हा लोकं माझी आठवण काढतील तेव्हा टचकन त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला हवं. माझ्याबद्दल ऐकताना माझ्या घरच्यांना गौरवान्वित आणि समाधानी वाटू दे, ना की तिरस्कार.
देवा, तुझ्याकडून मला ऐशो आराम वैगेरे असली महागडी मागणी काहीच नाहीये, खूप स्वस्त आणि तुला परवडणारी हीच एक मागणी आहे की, माझ्या मरणोपरांत माझं नाव आणि चारित्र्य हे निष्कलंक ठेव आणि सगळ्यांना सुखी व समाधानी ठेव.
तुझा विश्वासू,
...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा